रविवार, २४ जून, २०१८







लेखनाची आवड असणारी व्हिक्टोरिया राणी !



व्हिक्टोरिया राणीच्या नावानं मुंबईतलं व्हीटी स्टेशन ओळखलं जात असे, तिला आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या घटना लिहून ठेवण्याची सवय होती. तिला पत्रलेखनाचीही हौस होती. संबंधितांना ती मोठाली पत्रे लिहित असे. तिच्या लेखनाच्या आवडीमुळे तिच्या आयुष्यातील अनेक घटना-प्रसंग सर्वसामान्यांना ठाऊक झाले. प्रिन्स अलबर्टच्या संगतीनं स्कॉटलंडमध्ये घालवलेले दिवस हे आपल्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचे आणि सुखाचे दिवस होते, असं तिनं लिहून ठेवलंय. विशेष म्हणजे, या कालखंडात आणि पुढंही जेव्हा केव्हा एखादी समाधानकारक घटना घडत असे, तेव्हा ती लगेच आपल्या नोंदवहीत ती तपशीलवार लिहून ठेवत असे. आयुष्यातील सुखाच्या इतक्या 'सिरियस नोट्स' क्वचितच कुणी काढल्या असतील. 'लिव्हज फ्रॉम द जर्नल ऑफ आवर लाईफ इन द हायलँड्स'मध्ये तिच्या आठवणी सापडतात. स्कॉटलंडमध्ये हायलँड्स आणि लोलँड्स असे भाग आहेत. हायलँड्सला ऐतिहासिक महत्त्व आहे. हायलँड आणि लोलँडच्या भाषेतही फरक आहे. एकेकाळी तिथं मोठी लोकवस्ती होती, आता ती विरळ झाली आहे. निसर्गसुंदर हायलँडमधील वास्तव्य व्हिक्टोरियाला सुखावह वाटले नाही तरच नवल. प्रिन्स एडवर्डची ही कन्या अनेक अर्थाने भाग्यवान होती. दुर्दैवाने, तिचे तीनही भाऊ अकाली वारल्यामुळं ब्रिटिश साम्राज्ञीपद तिच्याकडं चालून आलं. ब्रिटिशांनी भारतावर कबजा केल्यानं ती भारताचीही साम्राज्ञी ठरली. तिच्या प्रभूत्वाचा कालखंड 63 वर्षांचा होता.
भारतातही जुन्या काळात अनेक महिलांनी आत्मचरित्र लिहून ठेवलं आहे. लक्ष्मीबाई टिळक (स्मृतीचित्रे), रमाबाई रानडे (आयुष्यातील आठवणी), लीलाताई पटवर्धन (आमची अकरा वर्षे), कमलाबाई देशपांडे (स्मरणसाखळी), पार्वतीबाई आठवले (माझी कहाणी), आनंदीबाई कर्वे (माझे पुराण) यांसह इतरही काहींचा त्यात समावेश करता येईल.
काही आत्मचरित्रांची वैशिष्ट्यं नमुनेदार आहेत. साहित्याचे नोबेल पारितोषिक पटकावलेल्या कार्ल स्पिटलर या स्वीस कवीनं लिहिलेलं आत्मचरित्र त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापर्यंतचीच हकीकत सांगते. स्पिटलरनं आशावादी आणि प्रेरणादायी कविता लिहिल्या. माणसाला साधारण चौथ्यावर्षानंतरच्या आठवणी तीव्रतेने स्मरतात. दात आणि पाय फुटल्यानंतरच्या घटना साधारणपणे लक्षात राहतात, असं मानलं जातं. पण स्पिटलरचं आत्मचरित्र फक्त चौथ्या वर्षापर्यंतचंच आहे.
आणखी एक गमतीदार आत्मचरित्र आहे जेम्स जॉयस या आयरिश कवी, कथाकार आणि कादंबरीकाराचं. त्याने तर बारा तासाच्या अवधीत त्यांच्या मनात जे विचार उमटले तेच टिपून ठेवले आहेत, त्याची आठशे पानं भरली. डब्लिन हे त्याचं अत्यंत आवडतं शहर होतं आणि त्याच्या लेखनात त्याचा वारंवार उल्लेख व संदर्भ येतो.


शनिवार, २३ जून, २०१८



पुनमचंद बिश्‍नोई


सलमान खानने गोळ्या घालून मारलेल्या काळविटामध्ये पुनमचंद बिश्‍नोईंनाच नव्हे; तर तमाम बिश्‍नोई समाजालाच त्यांचे गुरू जांभेश्‍वर यांचे प्रतिरूप दिसले. कारण 1451 साली बिश्‍नोई पंथाची स्थापना करणाऱ्या या गुरूंनी देह ठेवताना आपल्या शिष्यवर्गाला सांगितले होते, ""मी पुन्हा जन्माला येईन तो काळवीट होऊन.'' पुनमचंद या जोधपूरजवळच्या कंकानी गावात राहणाऱ्या बिश्‍नोईला ही गोष्ट जन्मजात ठाऊक होतीच. साहजिकच, 1998 साली सलमानने आपल्या सहकारी कलावंतांसमवेत केलेल्या काळविटाच्या शिकारीच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा होण्यासाठी पुनमचंद आणि संपूर्ण बिश्‍नोई समाजाने कंबर कसली. परिणामी सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली.
पुनमचंद त्यामुळे आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. "प्राणीमात्रावर दया करा',"वृक्षतोड करू नका' हा संदेश पंधराव्या शतकात गुरू जांभेश्‍वरांनी देऊन ठेवला आहे. पुनमचंदांनी सलमानच्या "दबंग'गिरीला न घाबरता शेवटपर्यंत लढा दिला. त्यांच्यापुढे आदर्श होता तो त्यांच्या समाजातील अमृतादेवी आणि आशू, रत्नी व भागू या तीन मुलींचा. शतकभरापूर्वी, जोधपूरच्या राजाने महाल बांधण्यासाठी खेजरी झाडं तोडायचा आदेश दिला. तेव्हा या झाडांना मिठी घालून या चौघी घट्ट उभ्या राहिल्या. त्यात त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. पण त्या जागच्या हलल्या नाहीत. नंतरच्या काळात सुंदरलाल बहुगुणांच्या "चिपको आंदोलना'ची हीच प्रेरणा होती. अशा धीरोदात्त, शूर बिश्‍नोई महिलांचा वारसा पुनमचंद सांगतात. हरिणाचे एखादे पाडस आईविना अनाथ झाले असेल तर आपल्या बाळाबरोबर त्या पाडसाला स्तनपान करणाऱ्या महिला आजही तिथे आढळतात. मग, पुनमचंदांनी शिकारी सलमानच्या जिप्सीचा पाठलाग करून गाडीनंबर लिहून वनखात्याकडे सोपवला यात नवल ते काय ! बिश्‍नोई टायगर फोर्स, .भा.जीवरक्षा बिश्‍नोई सभा आणि बिश्‍नोई वन्यजीव पर्यावरण संस्थान या संघटनांनी आजवर 400 शिकारी पकडून दिले आहेत. जैवविविधता आणि प्राणीमात्राच्या रक्षणासाठी प्राणार्पणाची तयारी ठेवलेल्या पुनमचंदांनी पुढच्या काळातही असे प्रकार होऊ नयेत, यासाठी डोळ्यात तेल घालून राखण करण्याचा विडा उचलला आहे. खरे पाहिले तर ही केवळ बिश्‍नोईंचीच नव्हे तर आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे, नाही का?




मोबाईल झाला गुरू !

कुगावच्या संतोषने मोबाईलद्वारे केला
पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यास


मोबाईलचा शोध लागला आणि सर्वांना आनंदच झाला. मग, त्यात सुधारणा झाल्या, स्मार्ट फोन आला. त्यातही अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. तथापि, कॅमेरा, व्हिडिओ शुटिंग, फोटोशॉपचा वापर करून फेसबुक, वॉटसअॅपवरून बदनामीचे प्रकार प्रामुख्याने केले जाऊ लागले. मात्र सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील कुगावच्या संतोष कामटे या तरूणाने मोबाईलचा वापर करून आपल्या आयुष्याला सुंदर वळण दिले. नुकत्याच झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास संतोषने चक्क मोबाईलवर केला. यासंदर्भात बोलताना संतोष कामटे म्हणाला, "कुठेही ट्युशन किंवा स्पेशल क्लास लावण्याइतके पैसे माझ्याकडं नव्हते. मात्र मोबाईलवर टेलिग्राम नावाचे चॅनल आहे. त्यावरून एमपीएसस्सीचा अभ्यास करता आला. "
टेलिग्रामवरील पीडीएफ फाईलच्या सुविधेमुळे अभ्यासासाठी पुस्तके मोफत उपलब्ध झाली. रोज किमान दहा तास अभ्यास केल्याचं संतोषनं सांगितलं. संतोषचे वडील सालकरी गडी आहेत. त्यामुळं त्यांचं आर्थिक उत्पन्न बेताचं आहे. कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा भागवला जात असताना संतोषच्या अभ्यासासाठी पुस्तकांचा खर्च त्यांना झेपणं शक्य नव्हतं. मात्र संतोष डगमगला नाही. मित्रांच्या मदतीनं त्यानं पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास केला. केवळ पुस्तकी अभ्यास करूनही भागणार नव्हतं. म्हणून संतोषनं शारीरिक क्षमताही सुधारली. त्यासाठीही पुन्हा मित्रच कामाला आले. आणि आता पोलिस उपनिरीक्षक बनण्याचं त्याचं स्वप्न साकार झालं आहे.
"कठीण समयी मोबाईल कामास येतो" अशी नवी म्हण संतोषच्या ध्यासानं कॉईन झाली आहे. तरूणांनी मनात आणलं तर मोबाईल शत्रू न वाटता आयुष्याला चांगलं वळण देणारा उत्तम मित्र बनू शकतो, हे सिद्ध झालं आहे.

- रजनीश जोशी