गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

मौनं सर्वार्थ साधनम्

 

मौनं सर्वार्थ साधनम् !



परवा रस्त्यानं जाताना कोपऱ्यातल्या चहाच्या टपरीवर पाच-सहा तरूण तावातावाने हातवारे करून भांडत असल्याचे दृश्य लांबून दिसले. मी जवळ पोचलो, तेव्हा ते सगळे मुके होते आणि खाणाखुणांच्या भाषेत मुक्यानेच बोलत होते, असे लक्षात आले. त्यांची ती मौनाची भाषा परस्परांना समजत होती. लांबून पाहणाऱ्याला मात्र त्यांच्यात संघर्ष चालल्यासारखं भासत होतं!

मौन बोलतं करतं तेव्हा ते अर्थपूर्ण असतंच, पण बऱ्याचदा अबोलणंही खूप काही सांगणारं असतं. खूपदा, अंतःकरण भरून आलेलं असतं, पण मुखावाटे एक शब्दही फुटत नाही. तरीही संवाद होत असतो. 'ये हृदयीचे ते हदयी' सगळं पोचत असते. असा मौनसंवाद असतो खूप दिवसांनी भेटलेल्या जिवलगांचा! आभाळ भरून आलेलं असतानाही ढग काही फुटत नाही, तशातला प्रकार!

मौन असं कुठं कुठं 'संवादत' असतं. नाटकातलं दोन वाक्यातलं मौन खूप काही बोलणारं असतं. कित्येकदा न बोलताही अपेक्षित परिणाम साधून जातं. कितीतरी दिवसांनंतर भेटल्यानंतरही फक्त 'हं ! हं !' इतकीच प्रतिक्रिया देणाऱ्या 'त्याला' ती म्हणते,''झालास पारवा? लागलास घुमायला!'' विजय तेंडुलकरांच्या 'मादी'मधला हा संवाद आहे. प्रेक्षकांना अधिकाधिक अर्थसन्मुख करणारा हा 'पॉज', हे क्षणकालाचं मौन अर्थगामी असतं. म्हणून अनेक उत्तम अभिनेते किंवा अभिनेत्री वाचाळ बडबडीपेक्षा मौनानं अधिक संवादतात!

योगसाधनेत मौन राहणं किंवा मौन पाळणं अत्याधिक महत्त्वाचं असतं. इगतपुरीच्या श्री. गोयंकागुरुजींच्या आश्रमात जितक्या दिवसांचा कोर्स असतो, तितके सगळे दिवस मौन पाळण्याचाच संकेत असतो. कोणताही साधक शक्यतो एकमेकांशी बोलून संवाद साधत नाही. आपल्या मनाची द्विधा अवस्था किंवा विचारांचा कल्लोळ हळूहळू शांत करीत माणसानं सर्वार्थानं निवांत व्हावं, यासाठीची ही मौनसाधना असते. मनाची मागणीच कमी होण्यासाठी ही तपस्या करावी लागते. आपले स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी मौनासारखे दुसरे साधन नाही.

रुसव्या-फुगव्यातलं मौन, तो अबोला अगदी कासावीस करून टाकतो दोघांना, पण काही काळ ओसरला की या मौनानंच त्यांना बोलकं केलेलं असतं. कवी हेमकिरण पत्कींच्या कवितेत हे मौनसंभाषण अल्पशब्दांतून प्रत्ययाला येतं. प्रेमामध्ये अशा अपघातानं उमटणाऱ्या मौनाला चांगला अर्थ असतो. तो अबोला, ते जाणते मौन अजिबात गौण नसतं, त्यातून नात्याला छान दिशा मिळते.

राजकीय मौन ही तर अर्थगर्भ खेळीच असते. कोणत्यावेळी बोलायचं आणि कोणत्यावेळी गप्प राहायचं हे मुरब्बी राजकारण्याला चांगलंच समजलेलं असतं. राजकारण्याच्या मौनाला अर्थाच्या अनेक छटा असतात, पण कोणता राजकारणी मौन पाळतो, त्याला फार महत्त्व आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या संसदेत मौन राहण्याच्या कृतीवर झालेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं होतं ते मौनातूनच!

एखाद्या अनुपम सौंदर्यानं आपण स्तीमित होतो, आपले शब्द विरून जातात. कन्याकुमारीच्या तीन समुद्रांच्या संगमातला सूर्यास्त पाहताना किंवा कोणार्कपासून तीन किलोमीटरवर असलेल्या समुद्रातून सूर्यबिंब हळूहळू वर येताना सूर्योदयाचं दृश्य पाहताना कितीतरी वेळ मी मूकस्तंभ झालो होतो..!


रजनीश जोशी

०००

प्रतिभावान वाघचवरे बंधू





प्रतिभावान वाघचवरे बंधू 


 'फोरेन्सिक ओडोन्टोलॉजी' या फारशा ज्ञात नसलेल्या विषयाचा अभ्यास असलेले डॉ. सत्यजित वाघचवरे आणि चंदिगढमध्ये 'टफमॅन' ठरलेले डॉ. अभिजित हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे त्यांचे बंधू ही अक्षरशः अफलातून प्रतिभा असलेली व्यक्तिमत्वे आहेत.

गड-किल्ल्यांवरची चढाई असो किंवा मॅरेथॉनसाठी धावणं; सोलापूरातील डॉ. सत्यजित आणि डॉ. अभिजित वाघचवरे यांचा त्यात उत्साहवर्धक सहभाग असतो. सोलापूरात 'सायक्लोथॉन' रुजवणारे हे दोघे डॉक्टरबंधू आपापल्या क्षेत्रात नामवंत आहेत. बोलता बोलता दंतरुग्णाच्या वेदना कमी करणारे दंतवैद्य डॉ. सत्यजित हे आगळे व्यक्तिमत्व आहे. तर अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून लौकिक असलेल्या डॉ. अभिजित यांनी मॅरेथॉनच्या माध्यमातून आपल्या नावाचा डंका सातासमुद्रापार पोचवला आहे. अलीकडेच त्यांनी चंदिगढ येथील 'टफमॅन' स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम आणि राष्ट्रीय स्तरावर पाचवे स्थान मिळवून आपला लौकिक वाढवला आहे.

डॉ. सत्यजित वाघचवरे 'डेंटिस्ट' म्हणून केवळ उपचारच करतात असे नाही, तर त्यांनी दातासंबंधी विशेष संशोधन केले आहे. त्याबाबत लेखनही केलं आहे. आपल्या देशात बऱ्याचदा भीषण अपघात होतात. त्यावेळी मृतदेहांची ओळख पटवणे ही मोठी जिकिरीची आणि भावनिक गोष्ट झालेली असते. डीएनए किंवा अन्य चाचण्या घेणेही कठीण असते, तेव्हा नेमकं काय करावं याविषयी ते सांगतात, ''दात ही व्यक्तीची खरी ओळख असते. ज्यावेळी डीएनए चाचणी घेणे शक्य नसते तेव्हा दाताची ठेवण, दातांचे अवशेष सबळ पुरावा म्हणून विचारात घेता येऊ शकतात. दातांवरून, दातांच्या रचनेवरून, दातांच्या फोटोग्राफ-एक्स-रे वरून, दातांवर केलेल्या इलाजांवरून एखाद्या व्यक्तीची ओळख पटवून देता येते. कारण दात हा शरीरातील सर्वात टणक अवयव आहे. त्याचे विघटन होणे तसे खूप अवघड असते. आपण वाचले ऐकले किंवा पाहिलेही असेल इजिप्तमधल्या ‌‌'ममी‌‌'चे दात आजही आहेत्याच स्वरूपात शाबूत आहेत. याचाच अर्थ दात कित्येक वर्षे न कुजता राहू शकतो. म्हणूनच दातांची रचना ही एखाद्या व्यक्तीची ओळख असते.''

फोरेन्सिक ओडोन्टोलॉजी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डॉ. सत्यजित यांनी अभ्यासला आहे आणि त्याबाबत सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लेखन केले आहे. झोपेतून उठल्यानंतर मुखमार्जनाची आवश्यकता का असते इथेपासून ते दात कसे स्वच्छ करायचे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. बरेच लोक ब्रशने दात घासताना फरशी घासल्याप्रमाणे जोर लावतात, परिणामी त्यांचे दात झिजतात, वाकडे होतात आणि पुढच्या काळात त्यांना त्रास होऊ शकतो, याविषयी डॉ. सत्यजित आपल्या रुग्णांशी करीत असलेला संवाद अक्षरशः श्रवणीय असतो.

सतत सात तास वीस मिनिटे वेगवेगळ्या प्रकाराने स्वतःच्या शरीराला कष्ट देणं ही सामान्य गोष्ट नाही. सुरूवातीला १.९ किलोमीटरचे स्वीमिंग, त्यानंतर ९० किलोमीटरचे सायकलिंग आणि त्यानंतर लगेच २१ किलोमीटर धावणे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यासाठी शरीर आणि मन, प्रबळ असणं गरजेचं असतं. त्यासाठी सहा महिने सतत कठोर परिश्रम, रोजचा सराव आणि त्यानुसार आहार ही खरं तर एक तपश्चर्याच म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय दर्जा काय असतो, त्याचा प्रत्यय डॉ. अभिजित यांनी दाखवून दिला आहे. यापूर्वी आयर्न मॅनचा किताब त्यांनी संपादन केला आहे, याखेरीज दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटर धावण्याची 'कॉमरेड्स मॅरेथॉन' त्यांनी पूर्ण केली आहे. चंदिगढच्या विजयामुळे ते आता 'टफमॅन' ठरले आहेत. त्यांना त्यांचे बंधू डॉ. सत्यजित यांच्याप्रमाणेच डॉ. राजश्री आणि डॉ. शुभांगी वाघचवरे यांचेही पूर्ण सहकार्य मिळते. संपूर्ण वाघचवरे कुटुंबच समाजसेवेच्या ध्यास घेतलेले आहे. शेती, वैद्यकीय व्यवसाय, मॅरेथॉनसारख्या स्पर्धांचे आयोजन, तरुणांकडून त्यासाठी तयारी करून घेणे, देशविदेशात ट्रेकिंग आणि तत्सम कारणासाठी दौरे अशा नानाविध उपक्रमात हे सारे कुटुंब रंगून गेले आहे.

०००