दुर्मीळ होतायत निसर्गाचे सफाई कामगार ! "गिधाड' असा शब्द उच्चारला तरी कित्येक
लोक दचकतात. पण हा पक्षी अतिशय उपयुक्त आहे. निसर्गाचे सफाई कामगार मानल्या
जाणाऱ्या गिधाडांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. 1980 मध्ये भारतात सुमारे 4 कोटी
इतक्या प्रचंड संख्येनं असलेले हे पक्षी आज दहा लाखावर येऊन ठेपले आहेत.
"इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर' या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये ही
बाब लक्षात आली आहे. कत्तलखान्यामध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी मोठा
खर्च होतो, मात्र तेच काम 600 गिधाडं विनाखर्च करतात. या खर्चाचा तपशील ध्यानात
घेऊन केलेल्या आकडेमोडीनुसार; एका गिधाडाची शहरी भागात किंमत होते 6 लाख 96 हजार तर
ग्रामीण भागात होते 5 लाख 85 हजार ! चार ते पाच मृत जनावरांवर प्रक्रिया करण्यासाठी
दरदिवशी 15 लाख रूपये खर्च येतो. मृत जनावरांवर होणारी प्रक्रिया, त्या प्रकल्पाचा
"मेंटेनन्स', वाहतूक या सगळ्याचा विचार करून ही 15 लाखाची रक्कम निघते. मध्यम
स्वरूपाच्या प्रकल्पात 164400 किलो इतक्या मांसावर प्रक्रिया होते. वर्षभरात सहाशे
गिधाडं 115200 किलो ते 172800 किलो मांस फस्त करतात. अशा स्वरूपाच्या मध्यम
प्रकल्पाला ग्रामीण भागात सहा कोटी सात लाख रूपये तर शहरी भागात सात कोटी नऊ लाख
रूपये लागतात. त्यावरून एका गिधाडाची शहरी आणि ग्रामीण भागातील किंमत ठरवण्यात आली.
गिधाडांची संख्या घटल्यामुळं भटकी कुत्री, घुशी वाढल्या. त्यामुळं रेबीज आणि
लेप्टोस्पायरोसिस या रोगांची लागण होण्याचं प्रमाण वाढलं. जंगलात कोल्हे, तरसांचा
कहर सुरू झाला. प्राणी एकमेकांना मारून खायला लागल्यानं वाघांची संख्याही भविष्यात
घटणार आहे. या सगळ्याचा पर्यावरणावर घातक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
गिधाडांची संख्या वाढण्यासाठी "व्हल्चर ब्रीडिंग सेंटर्स' म्हणजेच "गिधाड प्रजनन
केंद्र' निर्माण करण्याची गरज आहे. कोकणात काही ठिकाणी असा प्रयत्न झाला.
वनक्षेत्रात अशी केंद्रं झाली तर हे सफाई कामगार, स्वच्छतादूत वेगानं वाढू शकतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा