मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

सोलापूरच्या मातीतला विद्वान संपादक !

क्रिकेटपटू बापू साम्राणीच्या जोडीनं जोरदार बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून अरूण टिकेकर सोलापूरकरांच्या लक्षात आहेत. त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या सातरस्त्याकडून रंगभवनकडं जाणाऱ्या मार्गावर गरूड बंगल्यानजीक ते राहत. हरिभाई देवकरण प्रशालेचे ते विद्यार्थी. अगदी बालपणापासूनच वृत्तीत गांभिर्य आणि हुशारी असल्यानं अरूण टिकेकर हे वेगळं व्यक्तिमत्व आपला ठसा उमटवून जाई. "अक्षरनिष्ठांची मांदियाळी' हे ग्रंथशोध आणि ग्रंथसंग्रहाबद्दलचं त्यांचं पुस्तक अगदी अलीकडं प्रसिद्ध झालं. पण टिकेकरांचं घराणं सोलापुरात ओळखलं जातं ते पुस्तकप्रेमी आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार करणारं म्हणूनच. त्यांचे वडील सोलापुराकरांना "दूतमामा' म्हणून परिचित आहेत. दुतांचं "फिरतं वाचनालय' ही त्यांची संकल्पना अद्‌भूत होती. आता ग्रंथ घेऊन गावोगावी फिरणाऱ्या "व्हॅन' दिसतात. पण टिकेकरांचे वडील सायकलवर ग्रंथसंभार घेऊन घरोघरी जाऊन वाचनालय चालवत. पुस्तकांची आवड त्यांच्यात निर्माण झाली ती अशी वारसाहक्कानं. ग्रंथसंस्कृती विकसित करण्यासाठी पुढं अरूण टिकेकर आणि त्यांचे बंधू अरविंद टिकेकर यांनी मोठं काम केलं, त्यासाठी "दूतमामां'प्रमाणेच श्री. रा.टिकेकर या त्यांच्या काकांचही योगदान मोठं होतं. ज्या वृद्धांना वयामुळं वाचनालयात येऊन पुस्तकं घेणं कठीण होतं, त्यांना ती घरी नेऊन दिली पाहिजेत, असं ते म्हणत.
मुंबई विद्यापीठाचा इतिहास शब्दबद्ध करणारा "ज्ञानसागरू' हा त्यांचा ग्रंथ नंतर सिद्ध झाला, पण शालेय वयात, सोलापुरातल्या हरिभाई देवकरण प्रशालेतच हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता. शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन अध्यापनाची परंपरा तेव्हापासूनची. अरूण टिकेकरांना शिक्षकदिनी मुख्याध्यापक केलं जाई आणि प्रिन्सिपॉल मंगळवेढेकरांच्या कक्षात त्यांच्या खुर्चीवर विराजमान केलं जाई. मंगळवेढेकर सर प्रचंड शिस्तीचे. त्यांच्या खुर्चीत शिक्षकदिनी टिकेकरांना विराजमान होण्याची संधी मिळे, ही त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक ठरावी. पुढं चालून हा विद्यार्थीच "ज्ञानसागरू' ठरणार याची ती पूर्वखूण म्हणता येईल. 1961 साली हरिभाई देवकरण प्रशालेत दहावी उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात नाव कमावलं. त्या सगळ्यांचं स्मरणरंजन असलेला एक ग्रंथ टिकेकरांनी संपादित केला, त्याला "शिस्तीतलं मुक्तांगण' असं नाव दिलं. ह. दे. प्रशालेचे मुख्याध्यापक; त्यांना प्रिन्सिपॉल के. पी. मंगळवेढेकर असंच सारेजण म्हणतात; त्यांची करडी शिस्त आजही अनेकांच्या आठवणीत आहे, त्या शिस्तीत या विद्यार्थ्यांनी जे "मुक्तांगण' अनुभवलं त्यावरून दिलेलं हे शीर्षक अन्वर्थक आहे.
"महाराष्ट्र टाइम्स', "लोकसत्ता', "टाइम्स ऑफ इंडिया'सारख्या वर्तमानपत्रांमध्ये संपादक आणि "सकाळ'चे संपादक संचालक म्हणून त्यांनी पुढच्या आयुष्यात काम केलं, पण त्याचा पूर्वसूर संगमेश्‍वर महाविद्यालयातल्या "स्टुडुंट कॉलिंग'च्या भित्तीपत्राच्या संपादनात होता. त्यातलं टिकेकरांचं लेखन आणि संपादन कौशल्य यामुळं त्यावेळचे प्राचार्य डॉ. भोगिशयना यांचं त्यांच्याकडं लक्ष गेलं. त्यांनी या विद्यार्थ्यातली हुशारी जोखली. पुढं ते त्यांचे लाडके विद्यार्थीच झाले. पण फक्त प्राचार्यांचेच ते आवडते नव्हते तर क्रिकेटमधल्या त्यांच्या नैपुण्यामुळं ते विद्यार्थ्यांमध्येही अतिशय प्रिय होते, त्याचं उदाहरण म्हणजे संगमेश्‍वर महाविद्यालयात त्यांना विद्यार्थ्यांनी "जी.एस.' (जनरल सेक्रेटरी) म्हणून बिनविरोध निवडून दिलं.
"समाज स्पंदन' टिपण्याचं त्यांचं कौशल्य सोलापूरसारख्या बहुभाषिक शहरानं त्यांचं जे संगोपन केलं त्यामुळं वाढीस लागलं. विवेकवादी, विचारशील, बुद्धिवादी संपादक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली, त्याचं भरणपोषण सोलापूरच्या मातीतल्या सर्वधर्मसमभावाच्या जाणिवेनं झालं होतं. उद्योजक अन्वर सैफन, म्हैसकर कुटुंबीय (मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर यांचे निवासस्थान), अश्‍वत्थ वृक्षानं वेढलेल्या रमणीय घरात राहणारे जेऊरकर कुटुंबीय यांच्यासारख्या शेजाऱ्यांमुळं त्यांची समाजाबद्दलची जाणीव व्यापक होत गेली. सोलापूरच्या संतपरंपरेचा संस्कार त्यांच्यावर होताच, म्हणूनच "कान्होबा, तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासि का दिली वांगली रे', या अभंगाचं शीर्षक करून टिकेकरांनी लिहिलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या वादाचा लेख ठाकरेंना तर झोंबलाच, पण महाराष्ट्रात प्रचंड गाजला. "जशास तसं' वागण्याचं बाळकडू सोलापूरकरांमध्ये आहे. एरवी विवेकवादी विचारांनी त्यांची लेखणी संयमाने चाले, पण सोलापूरच्या मातीत असलेली अगम्य धाडसी वृत्तीही त्यांनी दाखवली. एखाद्याच्या तोंडावर परखडपणे बोलण्याचं धैर्य सोलापुराकरांमध्ये पुष्कळच आहे.
सोलापूरचे साहित्यिक द. रा. बेंद्रे, चित्रकार ए. ए. आलमेलकर, क्रिकेटपटू पॉली उम्रीगर, प्रा. श्रीराम पुजारी, ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य, प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख, प्राचार्य भोगिशयना डॉ. निर्मलकुमार फडकुले ही त्यांची श्रद्धास्थानं होती. अरूण टिकेकरांची प्रगल्भता या सर्वांनी ओळखली होती. प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्याच्या वितरण समारंभास सरदेशमुख सर दिल्लीला जाऊ शकले नाहीत, म्हणून साहित्य अकादमीनं तो कार्यक्रम सोलापुरात करायचा ठरवला. तेव्हा सरदेशमुखांसारख्या ऋषितुल्य व्यक्‍तीला कुणाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करायचा, हा प्रश्‍न निर्माण झाला. स्वतः सरदेशमुखांनीच अरूण टिकेकरांचे नाव सुचवून तो सोडवला.
"सकाळ'चे संपादक संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर 2005 मध्ये "सकाळ'च्या मुंबईतल्या फोर्ट कार्यालयात त्यांच्याशी काहीवेळा संवाद झाला. विधानसभा अधिवेशनाचं रिपोर्टिंग करण्यासाठी माझा तेव्हा मुंबईत मुक्काम होता. पुढं सोलापुरात अनेक कार्यक्रमांना ते पाहुणे म्हणून येत. सोलापूर श्रमिक पत्रकार संघानं ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला, त्यावेळी त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्यांच्याशी न बोलता, त्यांच्याबद्दल इतकी माहिती कशी गोळा केली, याबद्दलचं आश्‍चर्य आणि समाधान त्यांनी कार्यक्रमानंतर माझ्यापाशी व्यक्त केलं.
अलीकडं त्यांचं "कालान्तर' हे पुस्तक प्रसिद्ध झालं. हरिभाई देवकरण प्रशालेतल्या शाळुसोबतींबरोबर 23 जानेवारीला पुण्यात श्री. मुस्तीकरांकडं त्यांचं स्नेहसंमेलन व्हायचं होतं. आठवणीतलं सोलापूर तिथं आणखी उजळलं असतं. नटवर्य शशिकांत लावणीस, ऍड. जे. जे. कुलकर्णी ही त्यांची मित्रमंडळी सोलापुरातून तिकडं जाणार होती. पण टिकेकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. सोलापूरकरांच्या स्मरणात मात्र ते कायम असतीलच...! सोलापूरच्या पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचीच एकच इच्छा असते, "मला अरूण टिकेकर व्हायचंय...!' ते खूपच कठीण आहे, कारण "या सम हाच..!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा