सोमवार, ४ जानेवारी, २०१६

अमन की शम्मा जला के साथ चलो....
------
स्वतःवरचाही विश्‍वास उडावा, असे हे दिवस. जागरणाचे आचके देत निद्रिस्त असलेला समाज. डाव्या हातानं उजव्या हाताचा संशय घ्यावा, असं तप्तसंदिग्ध वातावरण. मग कुठून तरी हात हाती घेऊन चालण्याचा उद्‌घोष होतो. तरीही मनाला समाधान होत नाही. नुसते हात हाती नकोत तर त्वेष आणि द्वेष झटकून शांतीचा संदेश घेऊन बरोबर चालूया, असं सांगणारी कविता जन्माला येते. तिची भाषा उर्दू असते आणि कवी एजाज नबी कारीगर ! तोंडदेखल्या गप्पा आणि उसवत चाललेल्या नातेसंबंधानं माणसं कसनुशी होत चालली आहेत. अशावेळी आशेचा किरण दाखवणारी रचना माणुसकीचं दर्शन घडवते. श्री. कारीगर यांनी उर्दूमधून ज्या काव्यरचना केल्या आहेत, त्या "बर्गे हिना' (म्हणजे "मेंदीचं पान') काव्यसंग्रहात आहेत. मेंदी खुलवायची असेल तर तिचं पान जास्तीत जास्त ठेचलं पाहिजे. आपलं जीवन फुलवायचं असेल तर स्वतःला जास्तीत जास्त उपसलं पाहिजे.
आयुष्य सुंदर आहे. ते एकदाच मिळतं. ही सुंदरता वाढवण्याचं काम माणसं स्वतःच करतात आपल्या वर्तनानं. आपण इतरांशी जसे वागतो, तसं लोक आपल्याशी वागतात. उदासवाणे क्षण फेकून आनंदाचे गाणे गायले पाहिजे, त्यासाठी मन अलौकिक अशा शांतीनं पुरेपूर भरलेलं असायला हवं.
सुमारे चाळीस वर्षं शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना श्री. कारीगर यांनी परीक्षार्थींना उत्तीर्ण केलं नाही तर मनःपूर्वक विद्यार्थी घडवले. त्यांना माणसं जोडायला शिकवलं. आपल्या कवितेतून जे सांगितलं, ते आचरणातून दाखवलं. स्वातंत्र्य उपभोगणं म्हणजे उन्माद नव्हे तर अनेक मातांचे अश्रू सहृदयतेनं पुसणं, अनेक निष्पाप बालकांना अनिकेत होण्यापासून राखणं. द्वेष, नफरत मिटवण्याचा संदेश त्यांनी दिला.
सोलापूर ही कामगारांची नगरी. इथल्या माणसांच्या श्रमावर श्रीमंतांचे महाल उभे आहेत. "मजदूर' ही कारीगर यांची कविता मजुरांच्या व्यथांचं बोलकं चित्रण करणारी आहे. साहिर लुधियानवी यांच्या कवितांचा ठसा कारीगर यांच्यावर उमटलेला आहे. कित्येकांची घरं, इमारती आणि महाल बांधणाऱ्या हातांना मात्र अंधाराशी सलगी करतच दिवस कंठावे लागतात. किंवा दुसऱ्याचं ऐश्‍वर्य खुलून दिसावं म्हणून रेशमी वस्त्र विणणाऱ्यांच्या अंगावर धडके कपडेही नसावेत, हा विरोधाभास माणसाला अस्वस्थ करीत राहतो. मजुरांच्या जगण्याप्रमाणेच व्यसनाधीनता, हुंडा अशा समाजविघातक रूढींवर त्यांनी प्रहार केला आहे. हुंड्याचं स्वरूप वेगळं होत आहे, पण हुंड्याची प्रवृत्ती कायम आहे. तीच गोष्ट दारूमध्ये आयुष्य बुडवून टाकणाऱ्यांची. दारूच्या थेंबात मृत्यूचं तांडव असतं, असं ते म्हणतात. जीवनाविषयी, जगण्याविषयी आणि माणसांविषयी आत्यंतिक जिव्हाळा असणारा हा कवी आहे. म्हणूनच सोलापुरातल्या उर्दू शाळेमधल्या मुख्याध्यापकांना व्याधीमुक्त होण्यासाठी स्वतःबरोबरच आपल्या मित्रांकडून "मुशायऱ्या'च्या माध्यमातून त्यांनी निधी जमा केला. एका उर्दू कवीलाही अशीच मदत केली. एवढंच नाही तर उस्मानाबादच्या शम्सूल हायस्कूलमधील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली.
"जाऊ तिथं सुगंध निर्माण करू', अशा वृत्तीनं कारीगर सेवारत आहेत. कवीचं हृदय आणि माणसाचं मन घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. उर्दू भाषेवर प्रेम करणारा, इतरांनाही ती समजावी म्हणून शिकवत राहणारा हा अफलातून कवी एकात्मभाव जागवत आहे. आणि आजच्या काळाची तीच तर गरज आहे, नाही का? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा