सोलापूरचं सांस्कृतिक वैभव !
साल बहुधा १९८४ असावं. वेळ रात्री आठची आणि दिवस अर्थातच नोव्हेंबरातले, थंडीचे. राज्य नाट्य स्पर्धा सुरू होत्या.श्रीराम पंडित, प्रा. प्रकाश कुलकर्णी, इसाक शेख, स्नेहल परांजपे,शिरीष घाटे असे आम्ही सगळे 'हुतात्मा'समोरील मोकळ्या जागेत 'महापूर'बद्दल बोलत उभे होतो. राम पंडित मुख्य भूमिकेत होता. माझी भूमिका अगदी छोटी होती. पण नाटकाचं नेपथ्य,रंगमंच व्यवस्था, प्रकाश योजना, नाटकातील लहानमोठी प्रॉपर्टी जमवणे या कामात माझी मोठी मदत प्रा. प्रकाश कुलकर्णींना होत असावी. भैय्या उपारे पार्श्वसंगीत देणार होता. तोही हरिभाई देवकरण प्रशालेत चालणाऱ्या आमच्या सरावादरम्यान रोज उपस्थित राहत असे. 'हुतात्मा'मध्ये आमची चर्चा सुरू होती, ती नाटकातल्या कोर्टसीनमध्ये वापरायच्या लाकडी पिंजऱ्याची.आरोपी आणि साक्षीदार ज्या लाकडी पिंजऱ्यात उभं राहून साक्ष देतात, तो पिंजरा कसा तयार करायचा, याविषयी बोलणं सुरू होतं. इतक्यात, इनशर्ट केलेले एक गृहस्थ पार्किंगमधून सभागृहाच्या दिशेनं येत होते. त्यांना पाहून प्रा. कुलकर्णींनी हात केला आणि ते आमच्यापाशी आले. बाकी सगळ्यांना ते नावानिशी ओळखत होते. प्रा. कुलकर्णींनी माझी ओळख करून दिली. मी पोरगेला. पण अतिशय प्रेमानं त्यांनी माझा हात हातात घेऊन सलगी दाखवली. नाटकाची तालीम कशी सुरू आहे, 'महापूर' अवघड नाटक आहे वगैरे बोलणं झालं. कुणीतरी नाटकातल्या लाकडी पिंजऱ्याबद्दल मुद्दा मांडला. लगेच त्यांनी तो कसा तयार करायचा, त्यासाठी लाकूड कुठं मिळेल, किती लागेल, त्या पिंजऱ्याची उंची किती असेल, 'एल' टाईप केला तर लाकूड कमी लागेल वगैरे सांगायला सुरूवात केली. नामदेव वठारे यांची माझी ती पहिली भेट. सगळे हौशी नाटकवाले खिशातून पैसे घालून रंगमंचावर उभे राहणारे. त्यामुळे पिंजऱ्याला किती खर्च येईल त्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. नामदेव वठारे म्हणाले,' बॅटन पट्ट्या वापरा की मग.' शिरीष घाटेंच्या लक्षात आलं ते. त्यांनी त्यांच्या शैलीत गालातल्या गालात हसत होकार दिला आणि 'महापूर'मधल्या कोर्टसीनच्या नेपथ्याचा प्रश्न मिटला. सहज जाता जाता नामदेव वठारे यांनी मोठी अडचण दूर केली होती. बोलणं झालं आणि ते थिएटरमध्ये निघून गेले.प्रकाश कुलकर्णी, राम पंडित यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वास्तविक, त्या काळात आपापल्या नाट्य संस्थांबद्दल प्रत्येकाला प्रचंड अभिमान असे. स्पर्धेचं वातावरण होतंच.शिवाय एका नाट्यसंस्थेतील कलावंतानं दुसऱ्या नाट्यसंस्थेच्या नाटकात काम करायचं नाही, असा अलिखित दंडकच होता.कलावंतही संस्थेशी निष्ठा ठेवत. आपल्याला भूमिका नसली तरी दररोज तालमीला हजर राहत. काही हवेनको ते पाहत. गरजेला खंबीरपणे उभं राहत. त्यामुळं नामदेव वठारे यांनी अशा पद्धतीनं बहुमोल सूचना करणं सगळ्यांनाच आनंददायी वाटलं. 'महापूर'शी संबंधित आणखी एक घटना. मंदार काळे ललित कला मंदिराशी निगडित. पण ह.दे.प्रशालेतल्या 'महापूर'च्या तालमीला नित्य येई. नाटकात वकिलाची एक भूमिका होती. ती मंदारनं करावी, असं मी एकेदिवशी त्याला सुचवलं. तेव्हा तो म्हणाला, 'मी दुसऱ्या नाट्यसंस्थेत काम करतो. मला विचारावं लागेल.' दिग्दर्शक प्रा. प्रकाश कुलकर्णींनी मंदारला भूमिकेबद्दल विचारलं, तेव्हा नामदेव वठारेंची परवानगी घेऊनच तो'महापूर'च्या कलावंत चमूत सामील झाला. नामदेव वठारेंबद्दल जो आदर सगळ्याच नाट्य संस्थांमध्ये होता, त्याच्याशी संबंधित हे उदाहरण आजच्या काळात बोलकं ठरावं.
पुढं 'तरूण भारत'मध्ये मी 'सांस्कृतिक सोलापूर' हा स्तंभ लिहायला लागलो, सोलापुरातल्या सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती,संस्थांची माहिती मी त्यातून देत असे. 'ललित कला मंदिर'ची माहिती मला नामदेव वठारे यांनी सांगितली. त्यावेळी शैलजा मराठे यांनी मला ललित कला मंदिर आणि नामदेव वठारे या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत, ते आदरानं सांगितलं.तो लेख तयार झाला, त्यात वापरायच्या छायाचित्राबद्दल विचार सुरू झाला. तेव्हा गुरू वठारे पुढं आला. गुरूची एक स्टाईल पहिल्यापासून आहे. त्याच्या डोक्यात जे असेल तेच तो प्रत्यक्षात उतरवतो. माझ्या त्या स्तंभात वापरलेले आधीचे फोटो त्यानं पाहिले होते. त्यामुळं ललित कला मंदिरच्या लेखात वापरायचा फोटो गुरूनं लेख प्रसिद्धीच्या एक दिवस आधी अल्बममधून काढून आणून दिला. 'हाच फोटो वापरा,' असंही सांगितलं. ललित कला मंदिरबद्दल असलेलं प्रेम, संस्थेबद्दल प्रसिद्ध होणारी माहिती, याविषयी नामदेव वठारे आणि गुरू यांना अतिशय आस्था होती. त्यासाठी त्यांची अखंड धडपड चाले.
कमी खर्चात उत्कृष्ट नेपथ्याबद्दल सहजपणे मार्गदर्शन करणारे नामदेव वठारेंची ती भेट आणि पुढं माझ्या 'रूपक' नाटकाच्या नेपथ्याबद्दलच्या चर्चेतील गुरू वठारे. गुरूनं वडिलांची आठवण म्हणून 'रंगकर्मी प्रतिष्ठान' नावाची संस्था काढली. ती तो एकहाती चालवतो. राज्य नाट्य स्पर्धेत शोभा बोल्ली, प्रदीप कुलकर्णी यांनी 'रूपक' या माझ्या नाटकाचा प्रयोग केला.त्यातील नेपथ्यासाठी लागणाऱ्या वस्तू थेट विकत आणण्याचा निर्णय गुरूनं घेतला. घटना तीच. पण काळ बदललेला आणि पिढीही. मात्र त्यांच्यात समानता एकच, नाटक उत्तम झालं पाहिजे. तडजोड करायची नाही.
नव्वदीच्या दशकातली घटना. सारस्वत ब्राह्मण कार्यालय नुकतंच बांधलेलं. डॉ. जब्बार पटेल एका कार्यक्रमाच्यानिमित्तानं तिथं आलेले. कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. शशिकांत लावणीस, सुशीला व्हनसाळे, संजीवनी काळे आणि डॉक्टर असे आम्ही बोलत होतो. विषय निघाला नाटकांच्या निवडीचा . राज्य नाट्य स्पर्धेत आता कोणते नाट्यप्रयोग होतात, नाटकाची निवड कशी केली जाते वगैरे बोलणं सुरू होतं. डॉ. जब्बार पटेल यांनी सोलापुरातल्या त्यांच्या आठवणी जागवल्या. पुढं ते मुंबईत गेल्यानंतर नामदेव वठारे राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकाच्या संहितेसाठी घरी कसे येत, याविषयी डॉक्टर बोलत होते.जब्बारांनी काही नाटकांचा उल्लेख केला. म्हणाले, '' नामदेवला अशी भरपूर पात्रांची नाटके लागत. मी त्याला वेगळी नाटके सुचवे. तर त्यात ललित कला मंदिरातील सगळ्या कलावंतांना भूमिका मिळणार नाहीत, असं नामदेव म्हणे. बरं, तशा पद्धतीचं एखादं नाटक आहे, म्हणून मी सांगितलं की दुसऱ्या दिवशी नामदेव मुंबईत हजर. रेल्वेत टीसी असल्यानं त्याचा प्रवास अखंड सुरूच असे. आपल्या नाट्यसंस्थेतील सगळ्या कलावंतांना भूमिका मिळणारं नाटक स्पर्धेसाठी करायचं, हा नामदेवचा नाटकनिवडीचा 'क्रायटेरिया' होता.''
डॉ. जब्बार पटेल हे सांगत होते, तेव्हा नामदेव वठारे यांच्याबद्दलचा अभिमान ओसंडून वाहत होता. ''राज्य नाट्य स्पर्धा जवळ आली की नामदेवच्या मुंबईच्या वाऱ्या वाढत. मला त्याचे सतत फोन येत. मी कामात व्यग्र असे. पण नामदेवच्या डोक्यात संस्थेचं नाटक एवढाच विषय. त्याला नाटक मिळालं की मग मला उसंत मिळे,'' असं डॉक्टर म्हणाले. नामदेव वठारे यांची तळमळच त्यानिमित्तानं जब्बारांनी अधोरेखित केली होती.नाट्यसंहिता चांगली मिळाली पाहिजे, त्यात सगळ्यांना छोट्यामोठ्या भूमिका असल्या पाहिजेत. महिला कलावंतांचा आदर राखला गेला पाहिजे असे अलिखित नियमच होते, जे नामदेव वठारे पाळत. पुढं अशीच घटना घडली ती पुन्हा माझ्याच 'छेद' नाटकासंदर्भात. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सोलापूर केंद्रावर ते नाटक पहिले आले. अंतिम स्पर्धेसाठी मुंबईतल्या यशवंत नाट्यगृहात त्याचा प्रयोग होणार होता.नाटकातलं नेपथ्य, इतर छोट्यामोठ्या वस्तू कशा रेल्वेतून कशा न्यायच्या, यावर चर्चा सुरू होती. गुरू म्हणाला, 'मी पाहतो काय करायचं ते. गोपी, उद्या आपण मुंबईला जाऊ.' लगेच दोघे मुंबईला गेले. नाटकासाठी नेपथ्य पुरवण्याचे काम करणाऱ्या मुंबईतल्या संस्थेकडून आवश्यक त्या वस्तू भाड्याने घेण्याचा निर्णय घेऊन, त्यासाठी आगावू रक्कम भरून गुरू सोलापुरात परतला.नाटकासाठी खिशाला खार लावून घेण्याची नामदेव वठारे यांची निस्वार्थी वृत्तीच गुरूमध्ये संक्रमित झाल्याचं ते उदाहरण.
ललित कला मंदिरचा सुवर्णमहोत्सव हुतात्मा स्मृती मंदिरात मोठ्या झोकात झाला. त्यावेळी गुरूनेही खूप मेहनत घेतली होती, पण सुवर्णमहोत्सवी वर्षात संस्थेच्या सगळ्या जुन्या कलावंतांचा सत्कार आणि सन्मान झाला पाहिजे, अशी संकल्पना नामदेव वठारे यांनी मांडली. तसा तो झाला. तेव्हा अण्णा शिवशरण आणि अन्य सारीच मान्यवर कलावंत मंडळी रंगमंचावर उपस्थित होती. ललित कला मंदिर आणि नामदेव वठारे यांच्याबद्दल त्या समारंभात सगळ्यांनीच गौरवोद्गार काढले. एखाद्या मोठ्या एकत्र कुटुंबातली परगावी, परदेशी गेलेली मंडळी एकत्र जमावीत तसं ते दृश्य होतं. डॉ. जब्बार पटेलही त्यावेळी उपस्थित होते. रंगमंचावर झालेल्या औपचारिक कार्यक्रमातही संस्थेबद्दलचा जिव्हाळा दिसत होता आणि कार्यक्रमाआधी व नंतर नामदेव वठारे यांच्याबद्दलचा सगळ्यांचा स्नेह पाझरत होता. नाटक हे निमित्त, पण विविध क्षेत्रात काम करणारी, मोठमोठ्या हुद्द्यावर अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारी कलावंत मंडळी आपल्या परिवाराच्याच स्नेहसंमेलनात दाखल झाली होती. नामदेव वठारेंच्या प्रेरणेनं गुरूनं त्यासाठी परिश्रम घेतले होते. रेवण उपारेकाका आणि अन्य सगळ्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन होतंच, अशोक बोंदार्डे यांच्यासारख्या अधिकारीपदावरील कलाकाराचं सहाय्यही होतं.पिता-पुत्राच्या संस्थेवरील प्रेमाची ती अनोखी साक्ष होती.
पुण्या-मुंबईतल्या नाटकांमध्ये नेपथ्याची किंवा प्रकाश योजनेची नवी कल्पना राबवली की आपणही ती करून पहावी, असं नामदेव वठारे यांना वाटत असे. नटवर्य प्रभाकर पणशीकरांनी'तो मी नव्हेच'च्या निमित्तानं फिरत्या रंगमंचाची कल्पना राबवली. लगेच नामदेव वठारे यांच्याही मनात ललित कला मंदिरच्या नाटकासाठी फिरत्या रंगमंचाची कल्पना रुंजी घालू लागली. सोलापूरच्या हौशी रंगभूमीच्या इतिहासात फिरता रंगमंच आणणारे नामदेव वठारे हे पहिले नेपथ्यकार होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गुरू वठारेदेखील त्याच तयारीचा.ललित कलामंदिरचं नाटक असो किंवा अलीकडं रंगकर्मी प्रतिष्ठानचं. नेपथ्यात नाविन्य असलं पाहिजे, यासाठी गुरूचा अखंड विचार सुरू असतो. पोरे ब्रदर्सच्या स्टुडिओत वेळोवेळी होणाऱ्या गप्पांच्या मैफलीत नवं काही तरी करण्याचे मनसुबे रचले जातात. प्रा. दीपक देशपांडे, रविकिरण, निशांत आणि अप्पू पोरे, शरदकुमार एकबोटे, नागेश सुरवसे, अमोल धाबळे,अधूनमधून महेश चिंचोळी, नागेश ताकमोगे यांच्याशी चर्चाविमर्शातून, हास्यविनोद करीत नवनवीन कल्पनांवर विचार केला जातो. पोरेकट्ट्यावरील या हास्यविनोद आणि चर्चेचं महत्त्व गुरूनं वेळोवेळी मान्य केलं आहे.
नामदेव वठारे नाटकातील महिला कलावंतांची कुटुंबातील सदस्यांप्रमाणं काळजी घेत. रात्री उशिरा नाटकाची रिहर्सल संपल्यावर त्यांना व्यवस्थित घरी पोचवणं, त्यांना प्रवासात किंवा तालमीवेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ते जागरूक राहत. गुरू वठारे यांना ते बाळकडूच मिळालं आहे.गुरूच्याही मनात महिला कलावंतांबद्दल आदराची भावना आहे.फक्त आपल्याच संस्थेतील महिला कलावंतांबद्दल नाही, तर सोलापूरच्या रंगभूमीवर काम करणाऱ्या सगळ्या स्त्री कलाकारांबद्दल गुरूला नितांत आदर आहे. तो अनुभव सगळ्यांनी वेळोवेळी घेतला आहे.
ललित कला मंदिरची नाटके आणि त्यांचं सादरीकरण याविषयी सोलापूरच्या कलावंत मंडळीत बऱ्याचदा उलटसुलट चर्चा होत असे. कित्येकदा अनेक कलावंतांचं पाठांतरही नसे. रंगमंचावर ही मंडळी विसरत, मग प्रॉम्टिंगचा आवाज येई. मी एकदा त्याविषयी नामदेव वठारे यांनाच विचारलं होतं, म्हटलं,'असं कसं होऊ शकतं?' त्यावर त्यांनी छान उत्तर दिलं. ते म्हणाले होते, 'आपण हौस म्हणून नाटक करतो. नाटकात पाठांतर चोख असलं पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण आमचे बरेच कलावंत शिफ्ट ड्युटी करणारे आहेत. तालमीसाठी रोजच्या रोज वेळ देणं त्यांना जमत नाही. पण त्यांची नाटकावरची निष्ठा अभेद्य आहे. रेल्वेत शिफ्टमध्ये काम करणारी आमची कलावंत मंडळी दोन दिवसांनंतर सोलापुरात येतात. स्टेशनवरून घरी जाण्याआधी ते नाटकाची तालीम करतात आणि मग घरी जातात. नाटक चांगलं व्हावं, यासाठी ते मेहनत घेत नाहीत, असं कसं मग म्हणता येईल?' त्याचं हे प्रतिपादन ऐकून मी थक्कच झालो. ४८ तासांच्या ड्युटीवरून परतल्यावर घरी न जाता नाटकाची रिहर्सल करणारी ही नाट्यवेडी मंडळी सोलापूरचं भूषणच आहेत.ही तळमळ, ही जिद्द आता अभावानंच आढळते. झटपट रिझल्टच्या मागे तरूणांमधले बरेचजण लागल्याचे आढळते.नामदेव वठारेंच्या लेखी नाटक महत्त्वाचं होतंच, पण कलावंत असलेली माणसं त्यांना अधिक जवळची वाटत होती.नाटकातील भूमिका डावीउजवी झाली तरी चालेल, पण माणूस म्हणून एखाद्या कलावंताच्या आयुष्यात काही कमीजास्त झालं तर स्वतः त्यांच्या मदतीसाठी ते उभं राहत. अशी अनेक उदाहरणं आहेत. नाटकाची तालीम संपली की कलावंतांशी संबंध संपला, अशी त्यांची वृत्ती नव्हती. एकदा ललित कलामंदिरात कलावंत आला की तो थेट नामदेव वठारे यांच्या आयुष्यातच,कुटुंबातच दाखल होई. त्याच्या सुखदुःखात ते सामील होत.गुरूनंही हाच वारसा जपला आहे. गुरूच्या सहवासात आलेले कलावंत गुरूचे मित्र होऊन जातात. मग नाटक गौण होतं, आणि मैत्री महत्त्वाची होते. सोलापूरच्या नाट्यसृष्टीत प्रत्येकाला लागेल ती मदत करण्याची गुरूची वृत्ती हे नामदेव वठारे यांच्या विस्तारलेल्या वारशाचं प्रतीक म्हणावं लागेल. ज्या भक्तीभावानं गुरू, नामदेव वठारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत असतो, तेही नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे.वडिलांचा कीर्तीसुगंध असा पसरवत असताना गुरू व्यक्तिगत लाभाऐवजी रसिक सोलापूरकरांना चांगली नाटके पहायला मिळावीत म्हणून प्रयत्नशील असतो. नामदेव वठारे यांच्या मुशीत तयार झालेला गुरू वठारे हीच आता एक चालतीबोलती संस्था झाली आहे. नामदेव वठारेंना यापेक्षा वेगळं काय हवं असणार? अशी कलावंतमंडळी सोलापूरच्या नाट्यसृष्टीत आहेत,हेही सोलापूरचं सांस्कृतिक वैभवच म्हणावं लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा